Monday, February 17, 2014

आदिवासी जोडप्याने साजरा केला प्रेमाचा दिवस हेलिकॉप्टरमध्ये


दोन दिवसापूर्वी इंडिया मिडिया लिंक व इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र दुपारगुडे साहेबांचा फोन माझ्या फोनवर धडकला. त्यांनी मला सुचवले की तुमच्या प्रबळगड आदिवासी सामाजिक विकास संस्थेतर्फे मला काही वृद्ध आदिवासी जोडपे पाहिजेत. मी लगेच त्यांना प्रश्न विचारला “साहेब वृद्ध आदिवासी जोडपेच का?” त्यावर ते म्हणाले की “मला आदिवासी वृद्ध जोडप्यांना एक आनंदाचा क्षण म्हणून मला व्हॅलेंटाईन डे (प्रेमाचा दिवस) हेलिकॉप्टरमधून साजरा करायचा आहे. जर असे केले तर तुझी प्रतिक्रिया काय असेल?” मी लगेच त्यांना सागितले की हाच प्रेमाचा दिवस (व्हॅलेंटाईन डे) साजरा न करता जर तुम्ही ‘आदिवासी दिवस’ साजरा केला तर संपूर्ण भारतभर आदिवासी लोकांना गर्व होईल. कारण व्हॅलेंटाईन डे हा आदिवासी साजरा करत नाहीत. लगेच मी माझे मित्र गंगाराम बांगारा यांना याबद्दल फोन केला. त्यांनी पण सुचवले की हाच निधी जर एखाद्या आदिवासी वाडीवर खर्च झाला तर? माझ्याही मनात असे अनेक प्रश्न लगेच डोळ्यासमोर आले?… असो… प्रश्न होता एका चागल्या संधीचा. मग लगेच मी त्यांना होकारार्थी उत्तर देऊन कामाला लागलो. यासाठी मी माझे मित्र साप्ता. आदिवासी सम्राटचे संपादक आणि आदिवासी सेवा संघाचे संस्थापक श्री. गणपत वारगडा यांनाही त्यांच्यासोबत जावे म्हणून विनंती केली होती. जेणेकरुन आपल्या आदिवासी बांधवाना याप्रसंगी धीर यावा आणि प्रोत्साहन मिळेल. पण त्यांच्या वृत्तपत्राचा वर्धापन दिन असल्याने ते जाऊ शकले नाहीत. त्यामुळे मी आजूबाजूच्या आदिवासी वाड्यातील मित्रांना फोन करुन याबद्दल सागितले. पण कोणीही कार्यक्रमासाठी तयारी दर्शवली नाही. कारण सगळे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी घाबरत होते.
अशी संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून मी माझा गावातील वृद्ध लोकांना तयारी करून त्यांचे फोटो आणि त्यांची वैयक्तिक माहिती लगेच ई-मेल केली. १४ फेब्रुवारीचा कार्यक्रम लगेच पक्का झाला आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करुन त्या प्रसंगाची आठवण ह्दयात सामावून ते परत आले. आज त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडी याच प्रसंगाचे रसभरीत वर्णन ऐकायला मिळत आहे. त्यांचा या एका प्रसंगाने आनंद द्विगुणित करणारा एक भला माणूस अनायसे भेटला आणि उपकार करुन गेला. ओळख-पाळख नसलेला माणूस आदिवासी माणसांसाठी असे काही करेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. दऱ्या- खोऱ्यात जगणाऱ्या आदिवासींचे खडतर जीवन क्षणभर विसरायला लावणे, हेही नसे थोडके. आदिवासींना हेलिकॉप्टरमध्ये फिरण्यापेक्षा पिढ्यान-न्-पिढया दुर्लक्षित असलेल्या आरोग्य, शिक्षण, विज, रस्ते, पाणी या मुलभूत हक्कांची गरज जास्त आहे. पण याचीही कुणीतरी दखल घेईल आणि आदिवासींचा विकास होईल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. मी माझ्या परिने आदिवासी तरुणांना एकत्र करून प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्थेतर्फे माझ्या गावाचा आणि पर्यायाने परिसराचा विकास करण्यास सुरुवात केली आहे. त्या विकासाला हातभार लावण्यासाठी शासकीय अथवा बिगर शासकीय माणूस येईल, अशी आशा अजूनही सोडलेली नाही. 

या गावाच्या ठिकाणाबद्दल अधिक माहिती www.machiprabal.weeebly.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे 


निलेश (भाऊ) भुतांबरा

संस्थापक 

(प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्था)