Thursday, September 12, 2013

आदिवासी हाच खरा जंगलाचा राजा............

‘कुणब्याच्या जन्मा जाशील तर पेरू-पेरू मरशी,
वाघाच्या जन्मा जाशी तर तोलू-तोलू मरशी
पन् काथोड्याच्या जन्मा जाशी तर जंगलाचा राजा होशी’
अशी एक म्हण कातकरी जमातीत प्रचलित होती. तसे पाहायला गेल्यास सर्वच आदिवासी जमातींना आपल्या जंगलावरच्या स्वामित्वाबद्दल अभिमान असतो; आदिवासी या शब्दातच भारतातील आदिवासी जमातींचे आदिम तत्त्व सामावलेले आहे; त्यामुळे आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतात. आदिवासींचा वनावर आधारित औषधोपचार . आदिवासींचा वनांवरील वंशपरंपरागत हक्क आहे. ‘जंगलातील करवंद, आलीव, रानकेले, जांबुल, तोरणे, उंबर यासारखी फळे, चिकटीकंद, लवडीकंद, हलिंदकंद, कादुकंद, गोडकंद, चाईकंद यासारखी अनेक कंदमुळे, पाचागलीभाजी, कोलीभाजी, कोबडीभाजी, कुर्डूभाजी यासारख्या अनेक पालेभाज्या तसेच रानहळद, कर्जाच्या शेंगा, जंगलातील शिकार यासारख्या रानमेव्यावर खरी आदिवासी उपजीविका तर आहेच. शिवाय पूर्वी पासूनच आदिवासी अनेक प्रकारचे व्यवसाय हे जेगलावरच अवलंबून आहेत. परंतु इंग्रजांच्या आगमनापासून आदिवासींना जंगलातून हुसकावून लावण्यात आले आणि त्यांच्या जगण्याचा आधारच तुटला. 1861 मध्ये ब्रिटिश लॉ अॅ ण्ड रेव्हेन्यू सुपरिटेंडेंड वेडन-पॉवेल याने सर्वप्रथम देशात वन कायदा लागू केला, लेखणीच्या एका फटका-यानिशी त्याने भारतातील सर्व जमीन व जंगले इंग्रजांच्या मालकीची केली. त्याचा सगळ्यात जास्त फटका आदिवासींना बसला. परंतु आजही परिस्थिती बदललेली नाही. केंद्रीय आदिवासी विकास मंत्र्यांनी 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ‘वन हक्क कायदा’ कसा राबवावा, याचे निर्देश दिले आहेत. तेच निर्देश आदिवासींशी संबंधित सगळ्याच योजना वा कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी योग्य वाटतात. आदिवासींचा वनांवरील वंशपरंपरागत हक्क मान्य करून सरकारने त्यांना उपजीविकेसाठी ‘एक साली प्लॉट’ देण्याची तरतूद या वनहक्क कायद्यात आहे. ज्या आदिवासी कुटुंबाकडे त्या जमिनीचा ‘ताबा’ असेल, त्या वनखात्याच्या मालकीच्या जमिनीचे एक वर्षासाठी आदिवासी व्यक्तीकडे हस्तांतरण होते. त्या जागेला ‘एक साली प्लॉट’ म्हणतात; परंतु या कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्यामुळे आदिवासींचा वनांवरचा हक्क नाकारला जात आहे, ,‘जंगलातील फळे,कंदमुळे, बी-बियाणे आदींवर उपजीविका चालवण्याचा आदिवासींना हक्क मिळावा तसेच जंगलामध्ये त्यांना कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवेश मिळावा ‘वनहक्क कायद्या’ची योग्य पद्धतीने अमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभांच्या अधिकारात लवचिकता आणावी, जनजागृतीची माध्यमे अधिक प्रभावी करावी, यासोबत वनविभाग आणि अन्य संबंधित सरकारी खात्यांकडून केली जाणारी फरफट थांबली पाहिजे , असे स्पष्ट निर्देश या पत्रात दिलेले असूनसुध्दा, हे सगळे होत नसल्यामुळे खूप मोठय़ा प्रमाणात जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा वनाधिका-यांकडून छळ होत आहे. त्यांना त्यांच्या जागेतून हुसकावून लावण्यात येत आहे. कित्येक आदिवासींची तर त्यांच्याच जागेतून बेकायदेशीरपणे हकालपट्टी झालेली दिसते. निव्वळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींच्या हक्काचा सन्मानही राखला जात नाही, तर या अशा जुलमी पद्धतीने जंगल, ज्यावर आदिवासी जगत होते, ते हिरावून घेतले, देशातील हजारो एकर जंगल अगदी नष्ट केले होते. आजही देश स्वतंत्र होऊन सहा दशके उलटली तरी ही विस्थापनाची प्रक्रिया थांबलेली नाही. बिरसा मुंडांप्रमाणे अनेक नेत्यांनी आदिवासी तरुणांना स्वातंत्र्य आणि स्वराज्याची अंमलबजावणी पूर्ण करण्यास प्रवृत्त केले होते. अनेक प्रकारच्या, फसव्या गोष्टी सांगून आजही आदिवासींची दिशाभूल केली जात आहे थोडक्यात काय तर जंगलात होणा-या चकमकींत दोन्ही बाजूकडून मरणारा आदिवासीच असतो. गायरानाच्या हक्क आदिवासींची जमेल तशी दिशाभूल करत आहे. यासाठी शिकले, सवरलेले, आर्थिकदृष्टय़ा, राजकीयदृष्टय़ा सक्षम बनलेले लोक पुन्हा आपल्या पाडय़ावर परत आले पाहिजेत. वयोवृद्ध वडील जुना काळ आणि नवीन बदल याबद्दल बोलताना फार चांगले वर्णन करतात ‘पूर्वी आदिवासी जंगलावर अवलंबून होता, आता तो सरकारी सबसिडींवर अवलंबून आहे. ज्यावेळी आपण स्वावलंबी होऊन त्यावेळीच अपली प्रगती होईल

आदिवासी सुशिक्षित तरुणाने राजकारणात येण्याची गरज ....

या लेख मध्ये मी सुशिक्षीत आदिवासी तरुणाने राजकारणात का यावे याची गरज काय आहे हे मी थोडक्यात सांगणार आहे. आपली प्रशासकीय विभागाबद्दल थोडक्यात माहिती लिहित आहे. जर प्रशासकीय विभागाचा आढावा घेतला तर आपण प्रथम ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिष यांच्याबद्दल माहिती देत आहे.
ग्रामपंचायत स्तर कार्येप्रणाली -
सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य ,ग्रामसेवक
तालुका स्तर कार्येप्रणाली -
पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, सहाय्यक अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी, तसेच पंचायत समिती सदस्य .
जिल्हापरिषद स्तर कार्येप्रणाली -
अध्यक्ष, उपाध्यक्ष ,बांधकाम व वित्त समिती सभापती, शिक्षण व आरोग्य समिती सभापती, महिला व बालविकास समिती सभापती, समाज कल्याण समिती सभापती ,स्थायी समिती, अर्थ समिती ,शिक्षण समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, आरोग्य समिती ,बांधकाम समिती ,कृषी समिती, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, समाज कल्याण समिती, महिला व बालविकास समिती, तसेच जिल्हा परिषद सदस्य .
अश्या प्रकारे प्रशासकीय कार्येप्रणाली आखलेली असते .त्याच या प्रत्येकी ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती स्तर ,जिल्हा परिषद स्तर विभाजन दिसते . प्रत्येक स्तरावर विभागानुसार योजना आखलेल्या असतात .
विभाग व योजना याची थोडक्यात माहिती -
१. सामान्य प्रशासन विभाग, २. जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग, ३.अर्थ विभाग, ४. महिला व बाल विकास विभाग, ५ ग्रामपंचायत विभाग, ६ आरोग्य विभाग, ७ कृषी विभाग, ८ पशुसंवर्धन विभाग, ९. शिक्षण (प्राथमिक) विभाग, १०. शिक्षण (माध्यमिक) विभाग, ११.बांधकाम विभाग, १२.समाज कल्याण विभाग, १३. ग्रामिण पाणी पुरवठा विभागअशी विभागीय कार्येप्रणाली असते. त्यानुसार प्रत्येक विभागानुसार योजना राबवल्या जातात .
थोडक्यात सांगायचे झाले तर या सगळ्या विभागीय योजनेचे फायदे करून घ्यायचे असतील तर आदिवासी सुशिक्षित तरुणाने राजकारणात येण्याची गरज तर आहेच. शिवाय अशा होतकरू सुशिक्षित तरुणाला राजकारणात येण्याची संधी द्यावी.

माझ्या आदिवासी शेतकरी बांधवाना एक संदेश ..

इडा पिडा टळू शेतकऱ्याचे राज्य येऊ दे ..एकीकडे आदिवासी समाजाला शासने वन हक्क कायदा करून वनाचे हक्क दिले तर दुसरीकडे आदिवासी बांधव आपली जमीन विकत आहेत. आपल्या वडीलपूर्वजाकडून मिळाली धरणी माता विकणे कितपत योग्य आहे. आजची आणि उद्याची परिस्थिती काय असेल? याचा थोडा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
आज औद्योगिकरण, शहरीकरण, प्रदूषण, लोकसंख्या वाढ, भस्मासूरासारखी वाढणारी महागाई, यासारख्या मोठ्मोठया समस्यानी माणसाला भेडसावून सोडले आहे. यामुळे पुढच्या भावी पीडिला खूप मोठया आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. यामधील सर्वात मोठी समस्या महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. थोडक्यात विचार केला तर यासारख्या समस्या वाढतच चाललेल्या आहेत. संशोधनानुसार येत्या २०२८ पर्येंत पेट्रोल, डीझेल, यासारख्या पेट्रोलियम पदार्थांचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. मग दळणवळण, मोठमोठे उद्योग, या मोठ्या समस्यांना सामोरे तर जावे लागेलच पण यामध्ये सामान्य माणूस भरडला जाणार आहे. शिवाय शेतकरी मोठ्या अडचणीत सापडणार हे नक्कीच. कारणआजचा आदिवासी शेतकरी आपली जमीन कवडी मोलाने विकत चालला आहे. पुढे शहरात गेलेला माणसांचा लोंढा पुन्हा गावाकडे येईल. त्यावेळी गावामध्ये फक्त शेतकऱ्यांचे जीवन राहिले असेल. कारण ज्याच्याकडे जमीन असेल तोच पुन्हा या जगावर राज्य करील. त्यावेळीच खरे जमिनेचे महत्व समोर येणार आहे. यासारख्या समस्यांना उत्तर द्यायाचे असेल तर त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे जमीन होय. मग आजचा आदिवासी कवडी मोलाने आपली जमीन का विकत आहे? थोडक्यात विचार करा. आज मुंबई किवा मुंबईच्या आजूबाजूला मोठ्मोठे व्यवसाय जोरात सुरु आहेत, नवनवीन कंपन्या, नवनवीन अनेक लहान मोठे उद्योगधंदे, औद्योगिकरण, शहरीकरण भरपूर वेगात चालले आहेत. जर आपल्या पनवेल मधीलच परिवर्तनाचे बोलायचे झाले तर अनेक प्रकारे औद्योगिकरण सहज पाहायला मिळते. पनवेल जवळ असलेल्या गावामधील परिवर्तन पाहायला मिळत आहे.अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन विकली. त्या जमिनीवर धरणे, बिल्डिग, शेतघर, ट्रान्सपोर्ट, गोडावून , अनेक लहान मोठ्या कंपन्या, यासारखे प्रकल्प उभे राहिले आहेत आणि भविष्यात अजून अधिक मोठ्या प्रकारचे औद्योगिकरण होणार आहे.आपल्या शेतजमिनीवर मोठमोठे व्यावसायिक नजरा ठेवून आहेत, त्याच प्रमाणे भविष्यात नवी मुंबाई विमानतळ, मेगासिटी यासारखे आंतरराष्ट्रीय व्यवसाय आपल्या जमिनीवर साकारले जाणार आहेत. या परिसराचा विकास झाल्यानंतर तेथील स्थानिक आदिवासींची काय अवस्था होईल, याचा विचार न केलेलाच बरा. जर सांगायचे झाले तर तुम्ही आपल्या वडिलधाऱ्या माणसाना विचारून पहा. यापूर्वी त्यांनी किती संघर्ष केला आहे हे समजून येईलच. याचे एक उदाहरण पूर्वी मोठ्या प्रमाणत सावकाराचे जमिनीवर राज्य होते. त्यामुळे त्यावेळी सावकार शेतकऱ्याकडून जमीन कसून घेत होता आणि झालेले पूर्ण पिक सावकार घेऊन जात असे. मग वर्षभर जमीन कसून शेतकऱ्याला त्याचे दारिद्रय, उपासमारी हेच नशिबी यायचे. मग उपासमारीला कंटाळून शेतकरी पुन्हा सावकाराकडे कर्ज किंवा अन्न सुगी म्हणून आणत असे आणि ती सुगी फेडण्यासाठी पुन्हा शेतकऱ्याला सावकारापुढे हातपाय पसरावे लागत. पुन्हा सुगीच्या रूपाने आपल्या आदिवासी लोकांचे मोठ्या प्रमाणात शोषण, मारहाण होत असे. आता झपाटयाने सुरु असलेल्या शहरीकरणामुळे मुंबईलगतच्या परीसरातील आदिवासींच्या जमीन, कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात आहेत. त्यासाठी पैशांचे प्रलोभन वेळप्रसंगी दादागिरी करुन जमीन बळकावल्या जात आहेतिआदिवासींच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन आज आदिवासी बांधव आपल्या जमीनीवर परका होत चालला आहे. मग या सगळया परिस्थितीचा जाणीव असूनही आपण पुन्हा तीच चुक का करत आहोत? जर आपण आपली भूमिमाता वाचवली तरच आपली पुढची भावीपीडी वाचेल. नाही तर कालांतराने आदिवासी बांधवाना आपल्याच जमीनीवर परक्यासारखे रहावे लागेल. आजच्या घडीला राजकारणी आणि बडे व्यावसाकांनी संगनमताने मुंबईतील आरे कॉलनी, फिल्मसिटी आणि ठाण्याच्या येऊरमधील आदिवासींच्या जमीन कवडीमोलाने लाटून त्यांच्याच जमीनीतून त्यांना हदृपार केले आहे. आज ते एखाद्या परप्रांतीयासारखे जीवन कंठत आहेत.
त्यामुळे वेळेच सावध होऊन आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या जमीन विकू नयेत, अशी कळकळीची विनंती आहे.

माझा एक संदेश माझ्या आदिवासी बांधवाना ...


माझा लेख प्रसिद्ध करून मला आदिवासी लोकांपार्येंत माझे विचार पोहचवण्यासाठी एक सुवर्णसंधी दिली त्याबद्दल प्रथम मी माझे सहकारी श्री गणपत जानू वारगडा (पत्रकार) याचे मनापासून आभार मानतो. आपण आपल्या समाजासाठी करत असलेले कार्य अतुलनीय आहे. याअर्थी तुम्ही विशेषअंक काढून माझे विचार आपल्या आदिवासी समाजापर्येंत पोहचवण्यासाठी एक फार मोठी संधी दिली आहे. आदिवासी सामाजिक जागरुकता करून त्यांच्या कौशल्याचा उपयोग आदिवासी विकासासाठी करून घेणे व आदिवासी विकासासाठी कार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती व संस्था यांना एकाच मंचावर आणणे आहे. सामाजिक विकास हा कुणी एका संस्थेने, खात्याने किवा योजनेने होणार नाही. त्यासाठी सगळ्यांनी सोबत येऊन मेहनत घेणे गरजेचे आहे. तेवढेच ध्येय, दृष्टीकोन (विजन आणि मिशन) महत्वाचे आहे.आदिवासी विकासाचा विचार करता तेच प्रकर्षाने जाणवते, खूप साऱ्या संस्था, संघटना, समाजसेवक, शासकीय कर्मचारी आप-आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण जोपर्यंत आदिवासी युवकांमध्ये आणि समाजामध्ये विकासाबद्दल जाणीव होत नाही तोपर्यंत एकतर्फी विकास फक्त कागदावरच राहील. म्हणून आदिवासी तरुणांमध्ये आणि समाजामध्ये जागरुकता करण्यासाठी आणि सगळ्या आदिवासी संस्था, संघटना, समाजसेवक यांना एका व्यासपीठावर आदिवासी समाजाच्या भविष्याचा विचार करण्याकरिता मी हा संदेश देत आहे. आदिवासी समाज एक कुटुंब ही भावना तयार करून समाजात एकता आणणे महत्वाचे आहे. आणि हे सगळे कुणा एकाने शक्य नाही म्हणून सगळ्यांनी सोबत येऊन आपली आपल्या आदिवासी कुटुंबासाठी प्राथमिक जबाबदारी पार पडायची आहे . या भावनेने सामाजिक कार्यात सहभागी होणे अपेक्षित आहे त्यामुळे मी प्रथम तरुण वर्गाला पुढे येण्यास मन:पूर्वक संदेश पाठवत आहे .आदिवासी लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे त्यासाठी मार्गदर्शन व प्रचार करणे .धर्म, संस्कृती, कला, नृत्य, वाद्य, औषधोपचार यासारख्या गोष्टीचे महत्व आणि जाणीव टिकवून ठेवणे कर्म हीच पूजा असेल तर आपण आपले कौशल्य, वेळ, इ. आपला विखुरलेला आदिवासी समाज एक करण्याकरिता उपयोगात आणू या. आपल्या आदिवासी संस्कृतीला प्राधान्य देवून आपले उत्सव व परंपरा जपण्या साठी सुद्धा तितकीच मेहनत घेऊया.आदिवासी पर्यटक ठिकाणाची काळजी घेणे तसेच त्या इतिहासिक ठिकाणाचा विकास करणे आदिवासी  जमिनीवर होणारी बेकायदा अतिक्रमणे,अनेक शासकीय नियमाचे उल्घन करून मिळणाऱ्या परवानग्या थांबवणे. योजनाची माहिती देणे व राबवून घेणे .आदिवासी जमातींमधील कुपोषण, दारिद्रय आणि एकंदर रोगराई या सगळ्याचे मूळ अज्ञानात आहे ते दूर करणे. ध्येयप्रेरित समाजसेवकांनी तसेच आपल्या तरुण युवक वर्गानी आदिवासी भागात ज्ञानगंगा पोहचवण्याचे अथक व अफाट प्रयत्न करावे . दुर्गम पाडय़ा-वाडय़ा-वस्त्यांवर विखुरलेल्या आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणणे, आदिवासींच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करावे.आदिवासी शिक्षण, आरोग्य, भूमी, हक्क, रस्ते, विज, पाणी, सिंचन, स्वस्त दरात धान्य पुरवठा, घरकुल योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा, शबरी आदिवासी योजना यासारख्या अनेक शासकीय योजना नुसत्या कागदावर न राहता त्याचा फायदा गरजू आदिवासी लोकांना करून देणे. आजच्या स्पर्धेच्या युगात आदिवासी समाज जर टिकवून ठेवायचा असेल तर आणि त्यांचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर प्रथम आपला सुशिक्षित तरुण वर्ग पुढे आला पाहिजे.आपणही आपल्या समाजासाठी काही तरी करावे या दृष्टीने जर सुशिक्षित तरुण वर्ग पुढे आला तर खरंच आपल्या भावी पिडीचे भविष्य उज्वल होणार आहे . सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती आपलेसेपणाची भावना जपून आदिवासी लोकांना संगठीत करून जनजागृती करणे अपेक्षित आहे.